विजय चव्हाण/अक्षय देवडे
केडगाव/पाटस : दौंड तालुक्याला निरोप देण्यासाठी अवघड असणारा नागमोडी वळणाचा रोटी घाटात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि. १७) दुपारी १ वाजताच्या सुमारास पोहोचला. यावेळी पालखी रथाला आठ बैलजोड्या जादा लावून एकूण १८ बैलांच्या मदतीने पालखी रथाला घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेले. हे मनमोहक दृश्य अनेकांनी आपल्या डोळ्यांनी टिपले. यवत आणि वरवंड गावचा दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा रोटीच्या वळण घाटातून बारामती तालुक्यात गवळ्याच्या उंडवडीसाठी मुक्कामाला गेला आहे.
दोन दिवसाच्या पालखी सोहळ्याच्या सहवासाने दौंड तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले होते. ऐतिहसिक महत्व असलेला रोटी घाट जरी पालखी मार्गाच्या चौपदरी कामात नाहीसा झाला असला तरी नव्याने तयार झालेले रोटी घाट मात्र पालखी सोहळा पहिल्यांदाच कसा पार करेल व किती बैलजोड्यांची मदत घ्यावी लागेल हे दृश्य पाहण्यासाठी तालुका व तालुका बाहेरील नागरिक मोठ्या संख्येने रोटी घाट येथे आले होते.
रोटी घाटात दुपारी एक वाजेच्या सुमारास आठ बैल जोड्या जादा लाऊन एकूण १८ बैलांनी पालखी रथाला घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेले. रोटी घाट पार करून हा पालखी सोहळा रोटी येथे अभंग आरती करत हिंगणीगाडा मार्गे वासुंदे येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री ८ वाजताच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहचणार आहे. पालखीचा हा सर्वात मोठा टप्पा आहे.
हेही वाचा