पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज ( दि. १९) पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेले समन्स नाकारले. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी त्यांनी बाजावलेले हे सहावे समन्स आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, 'ईडी'च्या समन्सच्या वैधतेचे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. समन्सबाबत 'ईडी'ही न्यायालयात गेली आहे. आता 'ईडी'ला न्यायालयाच्या निर्णयाची वाट लागणार आहे. ( Arvind Kejriwal skips skips sixth ED summons )
'ईडी'ने केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात सुरू असलेल्या तपासात सहभागी होण्यासाठी सहाव्यांदा समन्स बजावले होते. त्यांना 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वीही ईडीने पाच समन्स पाठवले होते, त्याकडेही केजरीवालांनी दुर्लक्ष केले होते.
केजरीवाल वारंवार समन्स धुडकावत असल्याने ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनाणवीवेळी केजरीवाल यांनी १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार केजरीवाल १७ फेब्रुवारीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर झाले. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्चमध्ये आपण प्रत्यक्ष हजर राहू, असे आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिले. यानंतर न्यायालयाने हे आश्वासन मान्य करत या प्रकरणी १६ मार्चला सुनावणी निश्चित केली आहे.