Latest

मुंबई महापालिका निवडणूक आम्हीच जिंकू : अनुराग ठाकूर

अमृता चौगुले

नवी दिल्ली; सागर पाटील : भारतीय जनता पक्षाने संघटन मजबूत करण्याची दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू, असा विश्वास कल्याण आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. सेनेचा शिंदे गट तसेच भाजप यांची आघाडी मजबूत असून मुंबई महापालिकेची निवडणूक आमची आघाडी जिंकेल, असे ते म्हणाले.

भाजप कमकुवत असलेल्या लोकसभेच्या 144 जागांसाठी पक्षाने व्यूहरचना आखली असून प्रत्येक केंद्रीय मंत्र्याकडे दोन ते तीन मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. ठाकूर यांच्याकडे कल्याण आणि दक्षिण मध्य मुंबई हे मतदारसंघ आहेत. त्यांनी अलीकडेच या मतदारसंघाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.

कल्याणचे व दक्षिण मध्य मुंबईचे खासदार शिंदे गटात सामील झालेले आहेत. ठाकूर म्हणाले की, भाजपचा पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री म्हणून वरील मतदारसंघात गेलो होतो. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोणत्याही मतदारसंघात जाऊ शकतो. भाजप मजबूत झाली तर त्याचा फायदा आघाडीलाच होईल.

सर्वाधिक महसूल कमाविणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिका प्रसिद्ध आहे; पण क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही महापालिका पुरेसे प्रयत्न करीत नाही. अनेक मैदानांच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. केंद्र सरकार गृहनिर्माणासह अनेक योजनांसाठी निधी देते; पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासाची ठोस कामे झालेली नाहीत, असे ठाकूर म्हणाले.काँग्रेसच्या भारत

जोडो यात्रेचा भाजपच्या घोडदौडीवर परिणाम होणार नाही, असे सांगतानाच गुजरात, हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच विजयाची पताका रोवेल, असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT