नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अंतरिम जामीनासाठी नव्याने अर्ज सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. रिलायन्स उद्योगसमूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्याबरोबरच उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रदीपकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. इंटरलोक्यूटरी अर्जाशिवाय शर्मा यांनी जामीन अर्ज दाखल केला असल्याची बाब अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. पत्नीच्या वैद्यकीय कारणास्तव शर्मा यांना जामीन देणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद शर्मा यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. शर्मा यांची त्यांना वारंवार तुरुंगात येऊन भेटत असते. त्यामुळे जामीन देण्याचे काही कारण नाही, असे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जून रोजी होणार आहे.
प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला, त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एनआयएने ज्या प्रकारे गुन्ह्याचा तपास केला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोरडे ओढले होते.