पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन रेल्वे गाड्यांची धडक झाली आहे. या अपघातात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी २५ जण जखमी झाले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले की, विशाखापट्टणम-पलासा आणि विशाखापट्टणम-रायगड या दोन रेल्वेंमध्ये धडक झाली.
या अपघातात तीन डब्यांचा चक्काचुर झाला. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "बचावकार्य सुरू आहे, सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. पथके तैनात करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे."
ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ०८५३२) विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरला (ट्रेन क्रमांक ०८५०४) धडकली. या घटनेत किमान १० जण जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. सध्या सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.