कोरेगाव भीमा, पुढारी वृत्तसेवा: 'समता, न्याय, बंधुत्व अशा गोष्टींवर विश्वास ठेवून जे लोक १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येतात, त्यांना रोखण्याचा प्रयत्न काही जण करीत असून, बुलडोझरने क्रांती स्तंभ तोडावा, अशी वल्गना त्यांनी केली आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. अशा वल्गनांना आंबेडकरी समाज घाबरत नाही. आंबेडकरी समाज त्यांना आव्हान समजून १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी येथे दुपटीने आल्याशिवाय राहणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे,' असे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारी शौर्य दिनानिमित्त आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, या वेळी सुमारे 13 लाख अनुयायी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही बाबीचे नियोजन व्यवस्थित नाही. विजयस्तंभ परिसरात पाणी, बसण्यासाठी मांडव यांचीही पुरेशी सोय नाही. बार्टीच्या नियोजनशून्य कारभारामुळे विजयस्तंभ परिसरात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. मुळात इथे विद्यार्थ्यांसाठी असलेला फंड बार्टी का खर्च करते, असा सवालही आंबेडकरांनी या वेळी उपस्थित केला.