पुढारी ऑनलाईन : खलिस्तान समर्थक आणि 'पंजाब वारिस दे' चा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फरारी घोषित केले. यानंतर त्याच्या काही साथीदारांसह त्याच्या काकालाही पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. यानंतर आज (दि.२३) पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगचा जवळचा साथीदार गनमॅन तेजिंदर सिंग याला पंजाबमधील खन्ना या शहरातून अटक केली आहे.
पंजाब पोलिसांनी गुरुवारी (दि.२३) अमृतपाल सिंगचा जवळचा साथीदार तेजिंदर सिंग उर्फ गोरखा बाबा याला खन्ना शहरातून अटक केली. तो अमृतपाल सिंग यांच्या सुरक्षेसाठी भरती केलेला गनमॅन होता. अमृतपाल याच्या सोबतचे हातात शस्त्रास्त्रे असलेले विविध फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याचे रेकॉर्ड तपासले असता, त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम १८८ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अजनाळा प्रकरणातही त्यांचा सहभाग होता. या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे खन्ना शहराचे पोलिस अधिकारी (डीएसपी) हरसिमरत सिंग यांनी सांगितले आहे.
'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग याला पकडण्यासाठी पंजाब पोलिस युद्ध पातळीवर काम करत आहेत. मात्र त्याने पंजाबची सीमा ओलांडली असल्याची शक्यता पंजाब पोलिसांकडून वर्तवली आहे. तसेच तो महाराष्ट्रात असण्याची शक्यता देखील पंजाब पोलिसांनी व्यक्त केली आहे. यानंतर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील पोलीस देखील सतर्क असून, जिल्ह्यात येणा-या आणि बाहेर पडणा-या प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, खलिस्तानी नेत्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र एटीएसही सतर्क झाले आहे.
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पंजाबमधील इंटरनेट-एसएमएस सेवा रविवारपासून (दि.१९) बंद ठेवण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला होता. सध्या राज्यातील बऱ्यापैकी इंटरनेट-एसएमएस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र तरण तारण आणि फिरोजपूर या दोन जिल्ह्यातील इंटरनेट-एसएमएस सेवा शुक्रवार दुपारपर्यंत (दि.२४) बंद राहणार असल्याचे पंजाब सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये २४ मार्चच्या दुपारपर्यंत पंजाबमधील या दोन जिल्ह्यात सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर पुरवल्या जाणार्या सर्व डोंगल सेवा निलंबित राहतील, असे पंजाब सरकारकडून सांगण्यात आले आहे.