Latest

अमरावती : ‘कुत्र्याने कोंबडी का खाल्ली?’, शुल्लक कारणावरून तरुणाने सहा जणांना चिरडले; ३ ठार

backup backup

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत नाचोना गावात मंगळवारी (दि. १९)  रात्री दोन कुटुंबात झालेल्या वादात तिघांचा बळी गेला होता तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी आज (दि. २०) दिली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाचोना गावातील फिर्यादी किशोर अंभोरे यांच्या घरातील कुत्र्याने आपली कोंबडी का खाल्ली यावरून आधी शेजारील दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि यामध्येच आरोपीने आधी कुऱ्हाडीने हल्ला करून नंतर स्वतःच्या मालकीच्या चारचाकी वाहनाने एकाच कुटुंबातील अंगणात बसलेल्या सहा जणांना चिरडले. आरोपींमध्ये राधेश्याम गुजर व चंदन गुजर या दोघा पिता-पुत्राचा समावेश आहे. फरार असलेल्या दोघांनाही खल्लार पोलिसांनी अटक केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली. आरोपींपैकी चंदन गुजर यानेच सहा जणांना चिरडले असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

अनुसया अंभोरे, श्याम अंभोरे, अनारकली गुजर अशी मृतांची नावे आहेत. तर शारदा अंभोरे, उमेश अंभोरे, किशोर अंभोरे हे या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. अंभोरे कुटुंबाच्या शेजारीच राहणारा चंदन गुजर हा मारेकरी आहे. घटनेनंतर तो फरार होता. गुजर कुटुंबातील सदस्य रात्री जेवण आटोपल्यानंतर घरापुढे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी चंदन गुजर याने अंगणात येणाऱ्या कोंबड्यांवरून वाद सुरू केला. त्यावरून गुजर व अंभोरे कुटुंबांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची होऊन वाद विकोपाला गेला. वादाचे रूपांतर हाणामारीत आणि नंतर हत्याकांडात झाले.

SCROLL FOR NEXT