नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने टाळा. त्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोला, अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी ताकीद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नुकतीच दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली होती. याच भेटीत शहा यांनी पाटील यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. खा. संजय राऊत यांच्या एका वक्तव्याला उत्तर देताना पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा सहभाग नव्हता. अयोध्येत तेव्हा शिवसैनिक नव्हते आणि बाळासाहेब ठाकरे हेही तिथे नव्हते. त्यांनी केवळ नंतर जबाबदारी घेतली होती, असे ते म्हणाले होते. त्यामुळेच आता अमित शहा यांनी त्यांना ताकीद दिली आहे.