ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्याची कारवाई करत ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना दणका दिला आहे. लवकरच हेमंत वाणी हे देखील तडीपार होतील अशी माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमुळे ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पाठीशी राज्य सरकार असल्याचे संदेशही देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाच्या हत्येची सुपारी दिल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या बाहेर आहेर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सातजणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर कडक ताशेरे ओढले होते. असे असताना ठाणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात तडीपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
मार्च महिन्यात ठाणे पोलिसांनी चौघांना तडीपारीची नोटीस बजावली होती. तुम्हाला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार का केले जाऊ नये असे या नोटीसमध्ये म्हटले होते. त्यावर चौघांनी उत्तरासाठी मुदत मागितली होती. अखेर रविवारी ठाणे पोलिसांनी कडक भूमिका घेत अभिजीत पवार यांना तडीपार केले. दोन दिवसात हेमंत वाणी यांनाही तडीपारीची नोटीस बजावली जाणार आहे. कारवाईतून वादग्रस्त अधिकारी आहेर यांच्या सोबत प्रशासन आणि राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्याचा एकप्रकारे प्रयन्त झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.
जितेंद्र आव्हाड यांची राज्य सरकार विरोधातील आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर होणारे प्रश्नांचे भडीमार तसेच पालिकेतील भ्रष्ट्राचाराची निघणारी प्रकरणे यातून ही कारवाई झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आव्हाड यांना रोखण्यासाठी विविध आयुधे वापरली जात असताना आता त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आल्याचे बोलले जात आहे.