संगमनेर :पुढारी वृत्तसेवा : संगमनेर, अकोले तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अमृतवाहीनी इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अकोले येथील संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याच्या अतिशय क्लिष्ट असलेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात संगमनेर आणि अकोले पोलिसांना तब्बल दोन महिन्यानंतर यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणातील दोघाही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील सुकेवाडीरोडवरील पुनर्वसन कॉलनीजवळच असणाऱ्या नाटकी नाल्यात मागील वर्षी ८ डिसेंबरला संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर संकेतचा खून झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर संगमनेर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी तपासाला गती दिली. मात्र या घटनेनंतर मारेकरी संकेतचा मोबाईलही घेऊन गेले होते. त्यामुळे या खूनप्रकरणातील मारेकऱ्यांना शोधण्याचे मोठे आव्हान संगमनेर व अकोले पोलिसांसमोर उभे राहिले होते.
या प्रकरणातील मारेकरी सापडत नव्हते त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नातेवाईकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संकेत हा नाटकीनाल्याच्या परिसरात गेला होता. तेथे त्याचा शाहरुख हसन शेख (वय 22) व सलमान इमाम शेख (वय 30) या दोघांशी आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या त्या दोघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने घाव घातला. त्यातच संकेतचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मोटारसायकलवरुन काही अंतरावर नेवून नाटकीनाल्याच्या बाजूला फेकून दिला. यावेळी त्याच्या पायातील एक बूट घटनास्थळीच पडला होता, तर दुसरा बूट दुचाकीवरुन नेत असताना रस्त्याला घासून फाटला होता.
या संपूर्ण तपासात मयताची ओळख आणि केवळ त्याचा मोबाईल क्रमांक या शिवाय पोलिसांच्या हातात काहीच नव्हते. मात्र जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोलेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पो.ना.अण्णासाहेब दातीर, अमित महाजन, पो.कॉ.सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर विभा गाचे पो.ना.फुरकान शेख यांनी आपले प्रयत्न पणाला लावून अखेर संकेत नवले खून प्रकरणातील दोघे मारेकरी गजाआड करण्यात अखेर यश मिळवले आहे