कर्जत, पुढारी वृत्तसेवा: कर्जत तालुक्यातील चांदे व कोंभळी येथील वन विभागाच्या कामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी एसीबी विभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र अधिकार्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील, बलभीम राजाराम गांगर्डे, शेखर रमेश पाटोळे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
2015-16 मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत वन विभागाने कर्जत तालुक्यातील कोंभळी व चांदे या दोन गावात खोल सलग समतल चराची कामे केली. या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आल्यामुळे चौकशीचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाला देण्यात आले होते.4 सप्टेंबर 2021 पासूनच्या या सर्व कामांची चौकशी एसीबीने केली होती.
त्यात श्रीगोंद्याचे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक रमेश गोविंद गोलेकर चंद्रपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकरराव वृश्चिकेत पाटील, व्ही वाय शिंदे (मयत), राजूरचे वनरक्षक शेखर रमेश पाटोळे यांनी मौजे कोंभळी येथील 181 गटात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सलग समतल चर कामामध्ये संगनमत केले. फौजदारी पात्र कट रचून स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय योजनेच्या कामात खोटे कागदपत्र तयार करून अनियमितता व भ्रष्टाचार केला.
9 हजार 320 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मयत शिंदे यांना वगळून इतरांवर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(सी) (डी) 13 (2) तसेच कलम 468, 471, 120 (ब) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलिस उपाधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, हवालदार संतोष शिंदे, विजय गुण, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरून शेख, राहुल डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चांदे येथे अशाच पद्धतीने वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये 2015-16 मध्ये सलग समतल चर घेण्यात आले होत.े या कामांमध्येही गैरव्यवहार झाल्याने चौकशीचे केली. चौकशीत 12 मजुरांची नावे कॅशबुक दाखवून प्रत्येकी 4 हजार 854 इतकी रक्कम मजुरी म्हणून देण्यात आल्याच्या खोटी नोंद आढळल्या. त्यात 58 हजार 248 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. कर्जत पोलिसात रमेश गोविंद गोलेकर, शंकरराव वृचिकेत पाटील, श्रीमती पल्लवी सुरेश जगताप, वनपाल बलभीम राजाराम गांगर्डे वनरक्षक या सर्वांच्या विरोधात एसीबीच्या पथकाने आज कर्जतमध्ये घेऊन गुन्हा दाखल केला.