मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रस्ते अपघात कमी करण्यासाठी गेल्या १० वर्षापासून दिल्लीच्या नोएडा येथील तरुण स्वताच्या खर्चाने दुचाकी चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करीत आहे. ३६ वर्षाच्या राघवेंद्र सिंह यांनी आतापर्यंत ५६ हजार हेल्मेट दुचाकी चालकांना वाटले असून सुमारे ३० जणांचे प्राण वाचविले आहेत. विशेष म्हणजे राघवेंद्र यांनी आपले स्वताचे घर देखील हेल्मेट खरेदीसाठी विकले आहे. (Helmet Man)
रस्ते अपघातात सर्वाधिक बळी दुचाकी चालकांचे आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना आणि त्यांच्या मागे बसलेल्या सह प्रवाशांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहेत. परंतु नागरिक विविध कारणे देत हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करतात. जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी सुमारे ११ टक्के अपघात हे भारतात होतात. तसेच या अपघातात सर्वाधिक मृत्यु देखील भारतातच होतात. जगभरातील वाहनांपैकी केवळ एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी ११ टक्के वाहने भारतात आहेत. देशात दर तासाला ५३ रस्ते अपघात होतात आणि दर चार मिनिटाला एक मृत्यू होतो.
दिल्लीच्या ग्रेटर नोएडा येथे वास्तव्यास असणारे राघवेंद्र सिंह गेल्या १० वर्षापासून रस्ते अपघात आणि मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वता हेल्मेट खरेदी करुन त्यांचे चालकांना मोफत वाटप करीत आहेत. आतापर्यंत सुमारे ५६ हजार हेल्मेट त्यांनी चालकांना वाटले आहेत. राघवेंद्र यांचे मित्र क्रिशन कुमार ठाकुर यांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला. मित्र गमावलेल्या दुखातून बाहेर न पडलेल्या राघवेंद्र यांनी रस्ते सुरक्षाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आणि वाहतुकीचे नियम पाळा असे चालकांना सांगू लागले. चालकांना हेल्मेट घालावे, याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राघवेंद्र हे स्वता चारचाकी चालविताना देखील हेल्मेट घालतात.
राघवेंद्र यांनी आपल्या गाडीवर संदेश लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, यमराज ने भेजा है बचाने के लिए उपर जगह नही जाने के लिए. राघवेंद्र यांना हेल्मेट मॅन म्हणून ओळखले जाते.
राघवेंद्र यांनी आपले स्वताचे घर हेल्मेट खरेदीसाठी विकले आहे. त्यातून आलेल्या पैशांतून त्यांनी हेल्मेट खरेदी केले. पैसे कमी पडले म्हणून त्यांनी त्यांची पत्नी धनलक्ष्मी हिचे दागिने देखील गहाण ठेवले आहेत. हेल्मेट खरेदीच्या आड मुलाचे शिक्षण येऊ नये म्हणून राघवेंद्र यांनी सहा वर्षाचा मुलगा अंश याला आपल्या बिहार येथील गावी सरकारी शाळेत घालण्याचा मूळ निर्णय घेतला आहे.तसेच कुटुंबाची जबाबदारी आणि सुरक्षा मोहिम राबविण्यात येणारी अडचण यामुळे वडील राधे श्याम यांच्या घरी बिहारला जाण्याचा निर्णय घेतला आहे.