पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महसूल विभागातील 'तलाठी' या पदासाठी विक्रमी साडेअकरा लाख अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. या अर्जापैकी दहा लाख उमेदवारांनी प्रवेश फी भरली आहे. या पदासाठी विक्रमी अर्ज आल्यामुळे आता राज्यातील विविध केंद्रावर तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार असून, दररोज किमान 50 ते 60 हजार उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा किमान वीस दिवस चालणार आहे. राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने गेल्या काही वर्षांत 4 हजार 644 एवढे तलाठी पदासाठी राज्यातून अर्ज मागविले होते.
सर्व अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अर्ज भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. तर अर्ज भरण्यासाठी खुला गट एक हजार, तर इतर गटांसाठी 900 रुपये परीक्षा फी ठेवण्यात आली होती. वास्तविक पाहता 17 जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील उमेदवारांच्या आग्रहास्तव एक दिवस (18 जुलै) मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. या पदासाठी 11 लाख 50 हजार अर्ज प्राप्त झाले होते. दाखल अर्जापैकी 10 लाख उमेदवारांनी अर्जाची फी भरली आहे. फी भरण्यासाठी 20 जुलैपर्यत मुदत देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी फी भरली आहे तेच उमेदवार परीक्षेस पात्र असणार आहेत. दरम्यान, अर्जाची स्कुटिनी झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर होणार आहे.
तलाठी पदाच्या भरतीसाठी विक्रमी 11 लाख 50 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सुमारे 10 लाख उमेदवारांनी फी भरलेली आहे. अर्जाची ही संख्या लक्षात घेता ही परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. किमान वीस दिवस ही परीक्षा चालणार आहे.
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख.
हे ही वाचा :