नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूचे ५ हजार ३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सक्रिय रुग्ण आता २५ हजार ५८७ पर्यंत वाढले आहेत. प्रदीर्घ काळानंतर देशात एकाच दिवसात पाच हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच बुधवारी (५ एप्रिल) देशात ४ हजार ४३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ५६९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला. बुधवारी नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी २२१ रुग्ण एकट्या मुंबईत नोंदवण्यात आली आहेत. नवीन रुग्णांसह राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३८७४ वर पोहोचली आहे.