मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात डासांची दहशत असून या वर्षी राज्यात दर तासाला सरासरी 2 लोकांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र डेंग्यूमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. राज्यात डेंग्यूचे 17 हजार 531 रूग्ण आढळले आहेत.
यंदा सप्टेंबर महिन्यापासून मुंबईसह राज्यामध्ये डासांचा डंख वाढलेला आहे. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत डेंग्यूचे 17 हजार 531 रुग्ण आढळले आहेत. देशात डेंग्यूचे एकूण 2 लाख 34 हजार 427 रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर आहे, तर उत्तर प्रदेश सर्वाधिक रुग्ण म्हणजेच 33 हजार 075 तर बिहारमध्ये 19 हजार 672 रूग्ण आहेत. राज्यात डेंग्यूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक 74 मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये 51 आणि उत्तर प्रदेशमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे.