जयसिंगपूर : राज्यातील शक्तिपीठ धार्मिक स्थळांच्या सर्वागिण विकासासाठी तसेच पर्यटनांच्या दृष्टिने शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. हा मार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि. वर्धा) असा एकूण 805 किलोमीटरचा आहे. या महामार्गावरील 26 ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. यासह 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग प्रास्ताविक आहेत. हा शक्तिपीठ महामार्ग उभारण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च होणार असून 12 जिल्ह्यातील 27 हजार 500 एकराची जमीन यात हस्तंगत होणार आहे.
12 जिल्हयातील 12 हजार 589 इतक्या गट नंबरमधील 27 हजार 500 एकरातून हा महामार्ग जाणार आहे. या सुपर एक्स्प्रेसवेसाठी राज्य सरकार हजारो हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्यांतर्गत ही जमीन संपादित केली जात आहे. शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या महामार्गाचे भूमिपूजन 2025 मध्ये होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार आहे.
हा मार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे संबोधण्यात येणार आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. हा महामार्ग सहापदरी असणार आहे. महामार्गावरील 26 ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. यासह 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत.
तीर्थक्षेत्रे जोडणार…
हा महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी अशी तीन शक्तीपीठे जोडणार आहे. हा मार्ग औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांनाही जोडेल. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, सांगलीतील औदुंबर, कोल्हापूरमधील नृसिंहवाडी, पट्टणकोडोली, सांगवडे, कणेरी, आदमापूर यासह तीर्थक्षेत्राना जोडण्यात येणार आहे.