Latest

अनिल परब : “कामावर परत येण्यासाठी ST कर्मचाऱ्यांना ३ दिवसांची मुदतवाढ”

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : "शरद पवारांच्या उपस्थितीत २२ कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आली आहे. विलिनीकरणाबाबतचा अहवाल ३ आठवड्यांत न्यायालयात सादर केला जाईल. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचार करुन निर्णय घेतला जाईल. कामावर परत येण्यासाठी कर्मचाऱ्यांना ३ दिवसांचा मुदत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कामावर हजर व्हावं", अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, "एसटी कामगार कृती समितीचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. कारण आपली जनतेशी बांधिलकी आहे. काही लोकांनी घेतलेल्या भुमिकेमुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असावा, पण कुठंपर्यंत जावे हे समजायला हवे होते. मला राजकारण करायचे नाही. प्रश्न सोडवायचा आहे. कोणी काही भूमिका घेतली असेल त्या जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही. प्रवाशी अत्यंत महत्वाचा घटक आहे. दोन महिन्यांत त्यांच्यावर कोणती स्थिती निर्माण झाली होती यावर न बोललेले बरे. कोरोना वाढत असताना जेवढे करता येईल तेवढे केले आहे. कृती समितीने मांडलेल्या काही प्रश्नांवर परिवहन मंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी एसटी कृती समितीची परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यानतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत वेतनवाढीतील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहावे, असे आवाहन एसटी कृती समितीने केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कृती समितीची बैठक झाली. यात ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फी पर्यंतची कारवाई करण्यात आलेली नाही. अशा (सुमारे ५५ हजार कर्मचारी) कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे! त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानुसार कृती समितीमधील संघटनांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.

चर्चा करुन मार्ग काढायचा असेल तर एसटी सुरु करा. कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विलिनीकरणाची लढाई सुरुच राहील. पण त्यांनी अगोदर कामावर हजर व्हावे, असे आवाहन एसटी कृती समितीने केले आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यापैकी अनेकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर काहींना बडतर्फीच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. कर्मचारी कामावर न परतल्याने राज्यातील अनेक भागात एसटीची सेवा अगदी कमी प्रमाणात आहे. यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT