Latest

26/11 Mumbai Attack : ४५ दिवस रिकाम्या शवागारावर पोलिसांचा पहारा, वाचा धक्कादायक खुलासा

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 26/11 Mumbai Attack : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेदना १३ वर्षांनंतरही देश विसरू शकलेला नाही. पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात आलेल्या १० दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीला कसे लक्ष्य केले ते आजही लोकांच्या आठवणीत ताजे आहे. तत्कालीन सुरक्षा अधिकारी, प्रत्यक्षदर्शी किंवा त्या घटनेने प्रभावित झालेले लोक या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि त्याच्या साथीदारांबद्दल विविध खुलासे करताना आपल्याला दिसतात.

२६/११ च्या हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी राहिलेले रमेश महाले या संपूर्ण घटनेशी संबंधित त्यांच्या पुस्तकात असाच एक खुलासा करणार आहेत. इंग्रजी, मराठी आणि गुजराती या तिन्ही भाषांमधील महाले यांच्या 'या' पुस्तकात आजवर जगासमोर न आलेल्या अशा नव्या गोष्टींचा खुलासा करण्यात येणार आहे. या पुस्तकात महाले यांनी अशी अनेक गुपिते उघड केली आहेत, ज्यांची माहिती त्यांच्याच विभागातील लोकांना बराच काळ मिळाली नव्हती. अशाच एका घटनेबद्दल महाले यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांच्या पथकातील सुरक्षा कर्मचा-यांनी सुमारे ४५ दिवस रिकाम्या शवागारावर पहारा ठेवला होता. (26/11 Mumbai Attack)

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर माहिती समोर….

महाले यांनी पुस्तकात लिहिले आहे की, दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या ९ दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी २६ जणांची टीम तयार करण्यात आली होती. या टीममध्ये २५ सुरक्षा कर्मचारी होते. हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्व दहशतवाद्यांचे मृतदेह रात्रीच्या वेळी जेजे हॉस्पिटल येथून एका व्हॅनमध्ये घालून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आणि दफन करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण इतके गुपित होते की, शवागाराचे रक्षण करणार्‍या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती नव्हती. या प्रकराची माहिती नसताना मुंबई पोलिस गार्ड दीड महिना रिकाम्या शवागारात पहारा देत होते. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केल्यानंतर याची माहिती सर्वांसमोर आली.

अजमल कसाबलाही तपासणीसाठी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दोन दिवस ठेवण्यात आले होते. पोलिसांनाही याबाबत काही माहिती मिळत नव्हती. त्यानंतर त्याला तीन दिवसांची कंफेशनल कस्टडीसाठी कारागृहात पाठवण्यात आले. कसाबचे जबाब तीन दिवस कोर्टात नोंदवले जात होते. मुंबई पोलिसांनाही याची माहिती नव्हती. जेव्हा कसाबला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले, त्यानंतर मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. (26/11 Mumbai Attack)

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळा देश हादरून गेला होता. या हल्ल्याच्या काळ्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या असून तमाम भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी घटना आहे. मुंबई शहरावर हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांपैकी अजमल आमीर कसाब या एकमेव आरोपीला जिवंत पकडण्यात यश आले होते. मुंबई पोलीस दलातील हवालदार तुकाराम ओंबळे यांनी २६ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या छातीवर गोळ्या झेलून कसाबला पकडले होते. कसाबच्या चौकशीची धुरा तपास अधिकारी रमेश महाले यांनी सक्षमपणे सांभाळली. याच रमेश महाले यांचे '२६/११ मी आणि कसाब' हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. ८१ दिवस रमेश महाले यांनी मुंबईत घुसलेल्या १० दाहशतवाद्यांपैकी जिवंत सापडलेल्या कसाबची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान आलेले अनेक अनुभव आणि किस्से महाले यांनी या पुस्तकातून १० वर्षांनी मांडले.

रमेश महाले यांच्या मुंबई हल्ल्यावरील मराठीत लिहिलेल्या '२६/११: कसाब आणि मी' या पुस्तकात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेनंतर कसाब सुमारे अडीच महिने मुंबई क्राइम ब्रँचच्या ताब्यात होता. सुमारे डझनभर गुन्ह्यांमध्ये त्याला आरोपी करण्यात आले. शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या कसाबला त्याच्यामुळे किती निष्पाप जीव गमवावे लागले, याची खंत नव्हती असे महाले म्हणाले. तपासादरम्यान कसाबने कोणताही पश्चाताप व्यक्त केला नसल्याचे महाले यांनी पुस्तकात म्हटले आहे. परदेशी पर्यटकांची ये-जा कमी व्हावी आणि भारताविषयी असुरक्षिततेचा संदेश जगाला जावा आणि मुंबईचे पर्यटन बिघडवता यावे यासाठी आपण मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलो असल्याचे त्यांने सांगितल्याचीही नोंद पुस्तकात वाचायला मिळते.

SCROLL FOR NEXT