मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा पारा वाढला असून, उष्णताही प्रचंड वाढली आहे. पारा सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. राज्यात मार्चपासून आतापर्यंत 184 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 143 रुग्ण गेल्या 22 दिवसांतील आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरांत एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, संभाव्य धोका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
1 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 41 होती. मात्र 5 एप्रिल ते 26 एप्रिल या 22 दिवसांच्या कालावधीत 143 रुग्णांची नोंद झालेली असून एकूण रुग्णसंख्या 184 वर गेली आहे. यापैकी सर्वाधिक 20 रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळले आहेत. त्यानंतर ठाणे 19, नाशिक 17, वर्धा 16, बुलढाणा 15, तर सातारा येथे 14 रुग्णांची नोंद झाली आहे. उष्माघातासाठी आवश्यक असलेली औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांत उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाकडूनही सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आतापर्यंत 184 रुग्णांची नोंद झाली असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. उष्माघाताची रुग्णसंख्या वाढू लागल्याने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.