गुवाहाटी : जगभरातील प्रत्येक मुलासाठी शिक्षण अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. आपल्या मुलाने उत्तम शिक्षण घ्यावे, हा जवळपास पालकांचा निश्चितपणाने आग्रह असतो. आता भारतातही शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटलेले आहे आणि त्या द़ृष्टीनेच त्यांचे प्रयत्न राहात आलेले आहेत. पण, शिक्षण महागडे होत चालले आहे, ही अनेक ठिकाणची वस्तुस्थिती आहे. मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे असेल तर पालकांना पैशाची बचत करणे क्रमप्राप्तच असते. याचे कारण असे की, अनेक शाळांची फी एव्हाना लाखोंच्या घरात पोहोचली आहे. पण, याचदरम्यान आसाममधील एक अशीही शाळा चर्चेत आली आहे, जेथे रोख स्वरुपात कोणतीही फी भरावी लागत नाही. पण, फीच्या रूपाने चक्क प्लास्टिक बॉटल्स जमा कराव्या लागतात.
आश्चर्य म्हणजे या शाळेतील ड्रॉप आऊट रेट जवळपास शून्य आहे. शिवाय, येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी शिकता शिकता अर्थार्जनही करत असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या शाळेत मुलांच्या फीच्या स्वरूपात काहीही रक्कम भरावी लागत नाही. आता आजच्या घडीला कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही. पण, याचवेळी या शाळेत अजिबात पैसे भरावे लागत नाहीत. याचा अर्थ असाही नव्हे की, येथे फी जमा करावी लागत नाही. फी जमा करावी लागते. पण, ती रिकाम्या पास्टिक बाटल्यांच्या रूपाने!
आसाममधील या शाळेत ग्रामीण भागातील 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी फी म्हणून दर आठवड्याला 25 रिकाम्या बॉटल्स शाळेत जमा करायचे असतात. ही शाळा सुरू करण्याची संकल्पना परमिता व मजीन या जोडीला सुचली. त्यांनी परिसरातील घाणीचे साम्राज्य व शिक्षणाचा अभाव ताडला होता. या दोन्ही अडचणींवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी अशी शाळा उघडली, जिथे मुलांना शिकवले जाते. शिवाय, फीच्या स्वरूपात दर आठवड्याला प्लास्टिकच्या बॉटल्स संकलित केले जातात. दर महिन्याला प्रत्येक मुलाने फीच्या रूपात 100 रिकाम्या पास्टिक बॉटल्स जमा कराव्यात, इतकीच व्यवस्थापनाची येथे माफक अपेक्षा असते.