इस्लामाबाद ः वृत्तसंस्था
इम्रान खान यांचे सरकार पडण्यासाठी अमेरिकेचा हात नसल्याचे पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीने (एनएससी) 15 दिवसांत दुसर्यांदा स्पष्ट केले आहे. इम्रान खान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. कारण इम्रान खान प्रत्येक रॅलीमध्ये आपल्या सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यामध्ये अमेरिकेचा हात असल्याचे ठासून सांगत होते. गेल्या महिन्यात एनएससी एक बैठक झाली होती. त्यावेळी इम्रान खान पंतप्रधान होते. त्यावेळीही पाकिस्तानच्या राजकारणात अमेरिका ढवळाढवळ करत नसल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने स्पष्ट केले होते. एनएससीच्या बैठकीला पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते. ज्यांच्या कथित पत्रामुळे वाद निर्माण झाला होता ते असद मजिद सुद्धा या बैठकीला हजर होते.
इम्रान खान यांचे पत्र खोटे असल्याचा दावा वरिष्ठ पत्रकार रिझवान रजी यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी असद पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत होते. ते इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य होते आणि ते इम्रान खान यांचे खास दोस्त आहेत.
अमेरिकेला पाकिस्तानची काहीच गरज नाही. जर अमेरिकेला पाकिस्तानची गरज असती तर त्यांनी इम्रान खान यांची परवानगी कशाला लागली असती? अमेरिकेने लष्कराशी बोलणी केली असती. इम्रान खान विनाकारण राईचा पर्वत करत असल्याचे मूळ पाकिस्तानी अमेरिकन वकील साजिद तराड यांनी म्हटले आहे.