पुढारी ऑनलाईन डेस्क: बशर अल-असद सरकारने सत्ता सोडल्यानंतर सीरियामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबला होता. परंतु, काही दिवसांच्या शांततेनंतर, देश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. खरं तर, गेल्या दोन दिवसांपासून सीरियन सुरक्षा दल आणि माजी अध्यक्ष बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेने म्हटले आहे की, मृतांमध्ये ७४५ नागरिक आहेत, ज्यांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या.
सिरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे की, या संघर्षात १२५ सुरक्षा दल आणि १४८ असद समर्थक अतिरेकी मारले गेले. सीरिया सरकारने हिंसाचारग्रस्त लताकिया शहराचा पिण्याचे पाणी आणि वीज पुरवठा खंडित केला आहे. सीरियामध्ये गुरुवारी (दि.६) हिंसाचार सुरू झाला, जो लवकरच देशाच्या अनेक भागात पसरला.
शुक्रवारी (दि.७) सुन्नी मुस्लिम संघटनेशी संबंधित लोकांनी माजी राष्ट्रपती बशर अल-असद यांचे समर्थक असलेल्या अलावी समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. माजी राष्ट्रपती बशर अल-असद हे देखील याच समुदायाचे होते. बशर अल-असद सरकारमध्ये अलावी समुदायाला खूप प्राधान्य देण्यात आले आणि त्यांना सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले, असे आरोप आहेत. यामुळेच सीरियातील सुन्नी समुदायात याबद्दल नाराजी आहे आणि अलिकडच्या काळात जेव्हा सीरियन बंडखोर गट तहरीर अल शामने त्यांचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली सीरियाची सत्ता काबीज केली, तेव्हापासून सीरियातील अलावी समुदायात भीतीचे वातावरण होते.
हिंसाचारात त्यांच्या समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य केले जात आहे आणि रस्त्यावर आणि त्यांच्या घराबाहेर लोकांना गोळ्या घालून ठार मारले जात आहे, असा आरोप अलावी लोक करतात. अलावाइट समुदायाच्या लोकांच्या घरात लूटमार आणि जाळपोळ झाल्याच्याही बातम्या आहेत. आपला जीव धोक्यात असल्याचे पाहून, अलावी समुदायातील हजारो लोकांनी सुरक्षिततेसाठी जवळच्या पर्वतांमध्ये आश्रय घेतला आहे. बनियास शहर हे हिंसाचाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बनियासमध्ये अनेक लोकांचे मृतदेह रस्त्यावर आणि घरांच्या छतावर पडले होते.