पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशच्या अनेक भागात रविवारी (दि.4) पुन्हा एकदा हिंसाचार (Bangladesh protests ) उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशाच्या विविध भागांतून हजारो निदर्शक जमले होते. यादरम्यान रविवारी सत्ताधारी अवामी लीगचे समर्थक आणि आंदोलकांमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाली. या हिंसाचारात जवळपास ९८ लोकांचा मृत्यू झाला आहे.अनेकजण जखमी झाले आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात (MEA-Ministry of External Affairs) म्हटले आहे, बांगलादेशातील हिंसक निदर्शने दरम्यान भारताने नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला जाण्यापासून दूर राहावे. बांगलादेश सरकारने ११ दिवस इंटरनेट बंद ठेवले आहे. तर सरकारर कडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी ठेवण्यात आली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश मध्ये सध्या राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा त्याचबरोबर त्यांच्या हालचाल मर्यादित ठेवण्यासही सांगितले आहे. जर काही आपत्ती ओढावल्यास फोन नंबर 8801958383679, 8801958383680, 8801937400591 द्वारे संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानविरुद्ध लढलेल्या कुटुंबीयांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या राखून ठेवणारी कोटा प्रणाली संपुष्टात आणण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केल्याने गेल्या महिन्यात प्राणघातक निदर्शने (Bangladesh protests) सुरू झाली. निदर्शने हिंसक होऊन 200 लोक मारले गेल्यानंतर आंदोलक हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. बांगलादेश पोलिसांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर परतलेल्या हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला.
रविवारी (दि.५) राजधानी ढाका आणि बोगुरा, पबना आणि रंगपूर या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तसेच पश्चिमेला मागुरा, पूर्वेला कोमिल्ला आणि दक्षिणेला बरिसाल आणि फेनी येथे पोलीस आणि डॉक्टरांनी मृतांची नोंद केली आहे.