तेहरान, वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाच्या घोषणेनंतरही होर्मुझ सामुद्रधुनीमधील जहाज वाहतूक जवळपास ठप्पच राहिली आहे. जगातील तेल आणि एलएनजी पुरवठ्याच्या एक पंचमांश भाग हा सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे जागतिक ऊर्जा संकट कायम असल्याचे दिसते.
मंगळवारी जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर बुधवारी फक्त 5 जहाजे, गुरुवारी 7 जहाजे अशी एकूण मोजकीच जहाजे या सामुद्रधुनीतून गेली. पूर्वी रोज 120-140 जहाजे येथून पार करत असत. सध्या 600 हून अधिक जहाजे, त्यात 325 टँकर खाडीत अडकलेल्या अवस्थेत आहेत. कप्लरच्या विश्लेषक अना सुबासिक यांनी सांगितले की, ‘काही हालचाल झाली तरी अनुपालन करणारे मालक सावध राहतील. युद्धविराम टिकला तरी दिवसाला 10-15 जहाजांपेक्षा जास्त सुरक्षित वाहतूक शक्य नाही.’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर म्हटले, ‘इराण तेल जाण्यासाठी फारच खराब काम करत आहे. हे आमच्या करारानुसार नाही.’ इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर करार पाळण्यात अपयश आल्याचा आरोप केला आणि लेबनॉनमधील हल्ल्यांचा उल्लेख केला.
संयुक्त अरब अमिरातीच्या कंपनीचे सीईओ सुलतान अहमद अल जाबेर यांनी स्पष्ट केले, ‘होर्मुझ सामुद्रधुनी खुली नाही. प्रवेश नियंत्रित आणि शर्तींवर आहे. हे स्वातंत्र्य नव्हे, ही जबरदस्ती आहे.’
भारत आपल्या 80 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो. होर्मुझमधील अडथळ्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत शुक्रवारी सकाळी सुमारे 96 डॉलर प्रतिबॅरल होती. यामुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किमतींवर दबाव वाढू शकतो आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी सी. उदय भास्कर यांनी ‘अनिश्चितता आणि चिंता’ असल्याचे सांगितले.