पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतिजैवक किंवा अँटिबायोटिक यांच्या विरोधात प्रतिकार क्षमता विकसित केलेल्या जीवाणूंमुळे २०५०पर्यंत जगभरात ४ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे एका अभ्यासातून निष्पन्न झालेले आहे. हा रिसर्च पेपर लान्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
बॅक्टेरिया (जीवाणू) किंवा फंगस (बुरशी) यांच्या विरोधात अँटिबायोटिक किंवा अँटिफंगल औषधे बनवली जातात, पण कालांतराने हे बॅक्टेरिया किंवा फंगस यांच्यात या औषधांविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते. अशा प्रकारे बदल झालेल्या जीवाणूंना सुपरबग म्हटले जाते आणि या प्रतिकार शक्तीला Antimicrobial Resistance (AMR) असे म्हटले जात आहे.
या संशोधनानुसार AMRमुळे १९९० ते २०२१ या काळात दरवर्षी १० लाख लोकांचा मृत्यू होत आहे. जर या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही तर मृतांची संख्या वाढत जाईल, असे या संशोधनात म्हटलेले आहे. AMRमुळे आरोग्य व्यवस्थेवर १ ट्रिलियन डॉलर इतका भार वाढणार आहे, तर जागतिक जीडीपीचे ३.८ टक्के इतके नुकसान होणार आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे.
अँटिबायोटिक्सचा चुकीचा आणि अतिवापर यामुळे ही स्थिती निर्माण होते.
युनिर्व्हसिटी ऑफ वॉशिंग्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स इव्हॅल्युएशन या संस्थने हे संशोधन केलेले आहे. संशोधक मोहसेन नाघावी म्हणाले, "प्रतिजैवके हा आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया आहे. त्यामुळे जीवाणूंमध्ये निर्माण होत असलेली प्रतिकारशक्ती हा काळजीचा विषय आहे."
२०१६मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या समस्येची दखल घेतली होती, पण यावर फारसे काम होऊ शकलेले नाही. ही समस्या म्हणजे हवामान बदला इतकीच गंभीर असल्याचे, मानले गेले आहे.