बिश्केक (किर्गिझस्तान); वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील संघर्ष पेटल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच महत्त्वाची भेट होती. यावेळी भारताने प्रादेशिक वाद सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा वापर करण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर मोदी म्हणाले, शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत राहील.
पश्चिम आशियातील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा मोठा फटका भारतीय नागरिकांना बसला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १० खलाशांसह किमान १६ भारतीय नागरिकांनी या संघर्षात आपला जीव गमावला आहे, तर ७५ जण जखमी झाले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सागरी जलमार्ग आणि व्यापारी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या गरजेवर भर दिला. ऊर्जा पुरवठा आणि परदेशी व्यापाराच्या दृष्टीने हा सागरी मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारताची भूमिका अधोरेखित
कोणत्याही नव्या कराराची घोषणा झाली नसली तरी प्रादेशिक स्थिरता, नागरिकांची सुरक्षा आणि खुल्या सागरी वाहतुकीला प्राधान्य देत भारताने मुत्सद्दी भूमिका अधोरेखित केली.
द्विपक्षीय व्यापार आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी
दोन्ही देशांमधील पारंपरिक मैत्री अधिक दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. भारताकडून इराणला तांदूळ, चहा, साखर आणि औषधांची निर्यात केली जाते; तर इराणकडून सुका मेवा आणि फळे आयात केली जातात. आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यापार अधिक वैविध्यपूर्ण करण्याचा मानस भारताने व्यक्त केला. याशिवाय अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट जोडले जाण्यासाठी इराण हा भारतासाठी भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा दुवा मानला जातो.
युक्रेन युद्ध संपविण्याच्या दिशेने पावले उचला; पंतप्रधान मोदी यांचे पुतीन यांना आवाहन
युक्रेनविरोधात सुरू असलेले युद्ध संपविण्याच्या दिशेने पावले उचला, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केले.पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणि युक्रेनमधील संघर्षावर चर्चा करण्यासाठी पुतीन यांची भेट घेतली. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेच्यादरम्यान ही भेट झाली.