Asif Ali Zardari:
इस्लामाबाद : पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला असून, भारतातील काही नेते उघडपणे युद्धाची भाषा करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रादेशिक शांततेचा समर्थक म्हणून आपण युद्धाचा मार्ग सुचवणार नाही, भारताने युद्धाचे वातावरण सोडून अर्थपूर्ण चर्चेसाठी पुढे यावे, असा सूरही असिफ अली झरदारी यांनी आळवला आहे.
दक्षिण आशियातील बदलत्या राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीत या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. दक्षिण आशियातील वाढत्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना झरदारी बोलत होते, “क्षेत्रीय सुरक्षा आणि स्थैर्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे, पाकिस्तान भारतासोबत चर्चेस तयार आहे, असे देखील झरदारी यांनी सांगितले.
सीमापार हल्ल्यांच्या संदर्भात पाकिस्तानची सहनशीलता संपली असल्याचा इशारा देत त्यांनी अफगाण नेतृत्वावर दोहा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. अफगाण भूमीवरून Tehrik-i-Taliban Pakistan (TTP) आणि Balochistan Liberation Army (BLA) यांसारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानच्या शांततेला बाधा आणण्याचा कोणत्याही देशी किंवा विदेशी शक्तीला परवानगी दिली जाणार नाही, असं झरदारी म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कर्दू येथे हिंसक निदर्शनांनंतर तीन दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आला असून सैन्य तैनात करण्यात आले आहे. तसेच पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर चकमकी सुरू आहेत.
भारताने पाकिस्तान–अफगाणिस्तान आणि अमेरिका–ईराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. सीमेलगतच्या संवेदनशील भागांमध्ये, विशेषतः जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनांचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत. सीमावर्ती भागात बीएसएफ तसेच इतर सुरक्षा दलांची गस्त वाढवण्यात आली आहे.