Pakistan MP challenges Pakistan Army Chief Asim Munir : "तुम्हाला राजकारणच करायचे असेल, तर आधी आपला युनिफॉर्म (लष्करी गणवेश) काढा आणि मैदानात या. निवडणुकीत भाग घ्या. मग तुम्हाला समजेल की युनिफॉर्म घातलेल्या लोकांना किती मते मिळतात," अशा शब्दांमध्ये पाकिस्तान खासदार 'जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल' (JUI-F) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी थेट आव्हान दिले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका जाहीर सभेला संबोधित करताना मौलाना फजलुर रहमान म्हणाले, सैन्याची भूमिका संविधानाने स्पष्टपणे ठरवून दिली आहे. त्यामुळे सैन्याने राजकारणावर प्रभाव टाकण्याऐवजी आपल्या घटनात्मक मर्यादेत राहिले पाहिजे.
लष्कर पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत रहमान म्हणाले की, सरकार निवडणे किंवा ते पाडणे हे कधीही सैन्याचे काम नव्हते. तुम्हाला हवे त्याला सत्तेवर बसवण्याची आणि हवे त्याला सत्तेवरून खाली खेचण्याची ताकद तुमच्याकडे आहे. मात्र, कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कोणाचे जाणार हे ठरवणे लष्कराचे काम नाही," असे रहमान यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानची सद्यस्थिती बिकट होत चालल्याचा दावा करत त्यांनी नागरी प्रशासनावरील लष्कराच्या वाढत्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यापेक्षाही लष्करप्रमुख असीम मुनीर हेच सर्वाधिक प्रभावशाली व्यक्ती म्हणून पुढे येत आहेत. त्यातच सरकारने मुनीर यांचा लोकसंख्याविषयक एका उच्चस्तरीय समितीत समावेश केल्याने, प्रशासनातील लष्कराच्या वाढत्या हस्तक्षेपावरून वाद आणखी पेटला आहे.
दहशतवादाशी लढण्यासाठी सामान्य पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःचे सशस्त्र गट (मिलिशिया) तयार करावेत, या प्रस्तावाला या ज्येष्ठ नेत्याने तीव्र विरोध दर्शवला. देशाचे रक्षण करणे हे केवळ लष्कराचेच कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "ते म्हणतात की, 'आमचे सैनिक शहीद होत आहेत.' माझ्या मित्रांनो, तुमचे सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी लढतात कारण त्यासाठीच त्यांनी युनिफॉर्म घातला आहे आणि त्यांना पगार मिळतो. मग त्यांच्या रक्ताचे ओझे तुम्ही आमच्यावर का टाकता? माझ्या रक्ताघामाच्या पैशातून मिळालेल्या करातूनच त्यांना या कामासाठी पगार दिला जातो."
नागरिकांनी स्वतः हातात शस्त्रे घेण्याच्या कल्पनेचा धिक्कार करत रहमान म्हणाले, "तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही स्वतःचे लष्कर उभे करावे, शस्त्रे हाती घ्यावीत आणि सशस्त्र गटांशी स्वतः लढावे? मला कोणताही पगार मिळत नाही, असे ठणकावत अशा रणनीतीमुळे पाकिस्तान दीर्घकालीन हिंसेच्या खाईत ढकलला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. "तुम्ही तर निघून जाल, पण आमच्या भूमीला अशा वैयक्तिक वादात ढकलून जात आहात जे पिढ्यानपिढ्या चालत राहतील. तुम्ही या देशाला कायमस्वरूपी हिंसाचार आणि रक्तपाताकडे ढकलत आहात," असेही ते म्हणाले.
बलुचिस्तानमधील ढासळत्या सुरक्षा व्यवस्थेचे अत्यंत गंभीर चित्र मांडताना रहमान म्हणाले की, या प्रांतातील मोठा भाग आता सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. बलुचिस्तानच्या बलुच बहुल भागात बंडखोरी झाली होती. हा संपूर्ण बलुच भाग पाकिस्तानच्या हाताबाहेर गेला होता. आजही तिथे पाकिस्तानी सरकारचे कोणतेही नियंत्रण किंवा अस्तित्व नाही," असा दावा त्यांनी केला.पूर्वी केवळ बलुच बहुल भागापुरती मर्यादित असलेली ही अशांतता आता पश्तून भागातही पसरली असल्याचा दावाही रहमान यांनी केला.