Operation sindoor - india - pakistan Pudhari
आंतरराष्ट्रीय

Pakistan diplomatic failure | 'मुस्लीम कार्ड'वरून 'या' देशाने पाकिस्तानला लाथाडले; भारतालाच दिला पाठिंबा; नेमकं काय घडलं?

Pakistan diplomatic failure | आपण दोघे इस्लामिक देश म्हणत पाकने केला होता चुचकारण्याचा प्रयत्न; पण भारतीय धोरणांचेच झाले कौतूक

Akshay Nirmale

Operation Sindoor Pakistan diplomatic failure Malaysia rejects Pakistan request Indian delegation Abhishek Banerjee Sanjay Jha

क्वालालंपूर (मलेशिया): भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत आखलेल्या दहाही कार्यक्रमांना मलेशियात यशस्वीपणे परवानगी मिळाली असून, पाकिस्तानचा भारतविरोधी धर्माधारित प्रचार पूर्णतः अपयशी ठरला आहे.

पाकिस्तानी दूतावासाने मलेशियन अधिकाऱ्यांना भारताच्या शिष्टमंडळाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. "आम्ही इस्लामिक देश आहोत, तुम्हीही इस्लामिक देश आहात... भारताच्या शिष्टमंडळाकडे लक्ष देऊ नका," असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, मलेशियाने पाकिस्तानचा हा आग्रह स्पष्टपणे नाकारला.

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत शिष्टमंडळाचे मलेशियातील 10 कार्यक्रम नियोजित होते.

कोण होते शिष्टमंडळात?

हे शिष्टमंडळ विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी युक्त होते. जेडीयूचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात भाजपच्या अपराजिता सारंगी, बृजलाल, प्रदान बरूआ आणि हेमांग जोशी, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, सीपीएमचे जॉन ब्रिट्टास, काँग्रेसचे सलमान खुर्शीद, तसेच भारताचे माजी राजदूत मोहन कुमार हे सहभागी होते.

या शिष्टमंडळाने मलेशियाच्या People’s Justice Party (PKR) चे नेते व माजी मंत्री वायबी सिम त्झे त्झिन यांच्याशी संवाद साधला. या वेळी भारताच्या दहशतवादावरील कठोर भूमिकेची माहिती देण्यात आली आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक हल्ल्यांची माहिती दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’चे महत्त्व

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले आहेत. ही कारवाई "भारताचा नवीन सामान्य प्रतिसाद" म्हणून मांडण्यात आली आहे.

क्वालालंपूरमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “भारत आता पाकिस्तानशी संवाद तेव्हाच साधेल जेव्हा पाकिस्तान-व्याप्त काश्मीर भारताच्या हवाली करण्यास पाकिस्तान तयार होईल.”

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सहानुभूती

भारताचे प्रतिनिधी संजय झा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, "पाच देशांच्या दौर्‍यादरम्यान सर्व देशांनी पहलगाम घटनेतील पीडितांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आणि भारताच्या अचूक कारवाईचे कौतुक केले."

संजय झा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने (Indian Parliamentary Delegation) पाच देशांचा दौरा केला होता.

या "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत त्यांनी दहशतवादाविरोधी भारताची भूमिका मांडली आणि आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. या शिष्टमंडळाने जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया या देशांना भेटी दिल्या.

यंदा भारत-मलेशिया द्विपक्षीय संबंधांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

भारत आणि मलेशियात हिंदू-बौद्ध संस्कृती, व्यापार आणि भारतीय स्थलांतर यामुळे प्राचीन काळापासून संबंध आहेत. मलेशियात सुमारे 20 लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. दरवर्षी सांस्कृतिक आदानप्रदान, शिष्यवृत्ती योजना आणि शैक्षणिक सहकार्य कार्यक्रम राबवले जातात.

बॉलिवूड, भारतीय खाद्यसंस्कृती आणि योग यांचाही मलेशियात मोठा प्रभाव आहे. 20व्या शतकात भारतातून तमिळ, तेलगू, मल्याळी आणि उत्तर भारतीय मलेशियात गेले. 2025 मध्ये भारत-मलेशिया द्विपक्षीय संबंधांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष (50 वर्षे) साजरे केले जाईल.

दोन्ही बिलियन डॉलर पेक्षा अधिक व्यापार दोन्ही देशांमध्ये होतो. यात इलेक्ट्रॉनिक्स, पाम ऑईल, फार्मास्युटिकल्स, ऑटो पार्ट्स यांचा समावेश आहे. दोन्ही देश नौदल, लष्करी सराव आणि दहशतवादविरोधी सहकार्य करतात. Strait of Malacca मध्ये सामरिक सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT