पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य नेपाळमधील मदन-आश्रित महामार्गावर आज (दि.१२) सकाळी दोन बसेस भूस्खलनाने त्रिशूली नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये सुमारे ६५ प्रवासी होते. ६५ पैकी सात भारतीयांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता प्रवाशांचे शोध कार्य सुरु आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नेपाळमधील चितवन जिल्ह्यातील नारायणघाट-मुग्लिंग रोड विभागाजवळील सिमलताल परिसरात आज(दि.१२) पहाटे भूस्खलनाने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये बस चालकांसह एकूण ६५ लोक होते. संततधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका असल्याने रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी नारायणघाट-काठमांडू रस्ता १५ दिवसांसाठी बंद केला होता. त्यानंतरही वाहतूक पूर्ववत झाली होती.
"आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे. संततधार पावसामुळे हरवलेल्या बसचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत,” असे चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी ट्विट करत म्हटले आहे की,"नारायणगड-मुग्लिन मार्गावरील भूस्खलनात बस वाहून गेल्याने सुमारे पाच डझन प्रवासी बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे आणि पूर आणि भूस्खलनामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या वृत्तामुळे मला खूप दुःख झाले आहे. देशाच्या विविध भागात मी गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व व्यवस्था प्रणालीला प्रवाशांचा शोध घेण्याचे आणि सुटका करण्याचे आदेश देतो.