पुढारी ऑनलाईन :
पंतप्रधान मोदी आज (शुक्रवार) लाओसची राजधानी वियनतियाने मध्ये पूर्व-आशिया शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत नेहमीच आसियान देशांमध्ये एकतेचा पुढाकार घेत आला आहे. "आसियान हे भारताच्या इंडो-पॅसिफिक व्हिजन आणि क्वाड सहकार्याच्या केंद्रस्थानी आहे."
पीएम मोदी म्हणाले, "जगभरात सुरू असलेल्या विविध युद्धांचा सर्वात वाईट परिणाम ग्लोबल साउथच्या देशांवर झाला आहे. अशा परिस्थितीत जगात शांतता प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे. मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे. हे युद्धाचे युग नाही, असे आम्ही नेहमी म्हणतो.
पूर्व-आशिया परिषद सुरू होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मिल्टन वादळात मारल्या गेलेल्या लोकांविषयी दु;ख व्यक्त केले. याआधी पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी लाओसची राजधानी वियनतियाने मध्ये इंडिया-आसियान परिषदेत भाग घेतला. याच काळात मोदींनी भारत-आसियान शिखर परिषदेलाही संबोधित केले. शिखर परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की...
२१ वे शतक हे भारत आणि आसियान देशांचे शतक आहे असे मी मानतो. आज जगाच्या अनेक भागांमध्ये संघर्ष आणि तणाव असताना भारत आणि आसियान यांच्यातील मैत्री, संवाद आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय ते म्हणाले, "मी भारताचे ऍक्ट-ईस्ट धोरण जाहीर केले होते. गेल्या दशकात या धोरणामुळे भारत आणि आसियान देशांमधील संबंधांना नवी ऊर्जा, दिशा आणि गती मिळाली आहे."
लाओसमध्ये भारत आणि ब्रुनेई दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणाही मोदींनी केली. पंतप्रधान मोदी लाओसमध्ये 10व्यांदा भारत-आसियान शिखर परिषदेत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ते लाओसला पोहोचल्यावर बौद्ध भिक्खूंनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी व्हिएन्टिनमध्ये लाओसचे रामायणही पाहिले.