लंडन; वृत्तसंस्था : इराण युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) वाहून नेणारे एक जहाज (टँकर) होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताजवळ पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यूएईच्या कंपनीच्या व्यवस्थापनाखालील हा टँकर भारताच्या पश्चिम किनार्याजवळ दिसून आल्याने जागतिक ऊर्जा बाजारात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे.
हा 1,36,357 घनमीटर क्षमतेचा टँकर शेवटचा 30 मार्च रोजी आखात परिसरात दिसला होता. त्यानंतर अनेक आठवडे त्याचा सिग्नल बंद होता. सोमवारी जहाज ट्रॅकिंग डेटामध्ये तो भारताजवळ आढळल्याने त्याने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जहाजांची गुप्त हालचाल; सुरक्षेची चिंता
आखातातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक जहाजे आपले लोकेशन सिग्नल बंद ठेवत आहेत किंवा खोटी ओळख क्रमांक प्रसारित करत आहेत. यामुळे जहाजांच्या हालचालींबाबत स्पष्टता मिळवणे कठीण झाले आहे.
बाजारासाठी आशेचा सावध संकेत
एप्रिलमध्ये कतारची काही टँकर्स दोनदा होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न करूनही अपयशी ठरली होती. मात्र, याच महिन्यात ओमानचा एक रिकामा एलएनजी टँकर सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी झाला होता. या नव्या घडामोडीमुळे ऊर्जा पुरवठा साखळी पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली असली, तरी तज्ज्ञांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
1. यूएईच्या व्यवस्थापनाखालील एलएनजी टँकर भारताजवळ दिसला.
2. इराण युद्धानंतर प्रथमच भरलेला टँकर होर्मुझ पार केल्याची शक्यता.
3. जहाजे हल्ल्यांपासून बचावासाठी सिग्नल बंद ठेवत आहेत.
4. ऊर्जा बाजारासाठी हा प्राथमिक पण सकारात्मक संकेत मानला जातो.