पुढारी ऑनलाईन डेस्क : कुवेतमधील सहा मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीतील मृतांचा आकडा हा ४९ वर गेला आहे. मृतांमध्ये ४० भारतीयांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत माहिती देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, "अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत. दूतावासाने कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन आणि नियमित कॉल सेवा सुरु केली आहे." (Kuwait fire) दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत निधीतून पीडितांना 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
दक्षिण कुवेतमधील मंगाफ शहरात बुधवारी (दि. १२) सहा मजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये ४० हून अधिक भारतीय आहेत. अन्य मृत पाकिस्तान, फिलिपाइन्स, इजिप्त आणि नेपाळमधील आहेत. ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ज्या इमारतीत आग लागली तेथे कामगारांचे वास्तव्य मोठ्या संख्येने होती, अशी माहिती कुवेतमधील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आग लागलेली इमारत ही केरळमधील व्यक्तीच्या मालकीची आहे. ( Kuwait fire)
दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग जखमी भारतीयांना मदतीसाठी आणि मृतांचे मृतदेह परत आणण्यासाठी कुवेतला रवाना झाले आहेत. कुवेतला जाण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, काही मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळख पटू शकत नाही. बाकी परिस्थिती तिथे पोहोचल्यावर स्पष्ट होईल. दिल्ली विमानतळावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कीर्ती वर्धन म्हणाले की, आम्ही बुधवारी (दि.१२) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक घेतली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून आहोत. बाकी परिस्थिती तिथे पोहोचल्यावर स्पष्ट होईल.
आगीत प्राण गमावलेल्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. मृतदेहांची ओळख पटताच नातेवाईकांना कळवले जाईल. भारतीय हवाई दलाचे विमान मृतदेह परत आणतील. कुवेतमधील भारतीय दूतावास या घटनेत बाधित झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दूतावासाने कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन +965-65505246 (Whatsapp आणि नियमित कॉल) सुरू केली आहे. ( Kuwait fire )
हेही वाचा