Iran attack chemical tanker
तेहरान : ओमानच्या किनारपट्टीजवळ १२ भारतीय खलाशी असलेल्या एका केमिकल टँकरवर इराणच्या तटरक्षक दलाने (Coast Guard) हल्ला केला आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी 'एमटी सायरन' (MT Siron) या टोगोचा ध्वज असलेल्या जहाजाबाबत घडली. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी या घटनेची माहिती दिली.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक मनदीप सिंग रंधावा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "२५ एप्रिल २०२६ रोजी टोगोचा ध्वज असलेल्या 'एमटी सायरन' या केमिकल टँकरबाबत एका घटनेची नोंद झाली आहे. या जहाजावर भारतीय खलाशी तैनात होते. ओमानमधील शिनास बंदराच्या बाह्य हद्दीत ही घटना घडली. हे जहाज इतर जहाजांच्या ताफ्यासोबत जात असताना इराणच्या तटरक्षक दलाने 'वॉर्निंग शॉट्स' (इशाऱ्यासाठी गोळीबार) झाडले. सुदैवाने, जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.
जहाजबांधणी मंत्रालय या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालय (MEA), भारतीय दूतावास आणि इतर संबंधित घटकांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि सागरी भागधारकांच्या सतत संपर्कात आहोत. खलाशांची सुरक्षा आणि सागरी ऑपरेशन्स सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या भागातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत," असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही काळातील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) 'VLCC सन्मार हेराल्ड' आणि 'जग अर्णव' या दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला होता. ही जहाजे 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पार करण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला होता, ज्यावर भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता.
रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ओमानला भेट दिली. तेथे त्यांनी ओमानचे सुलतान आणि त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली.ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल्बुसैदी यांनी 'X' वर माहिती दिली की, दोन्ही देशांमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल (Strait of Hormuz) सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाप्रती असलेली जबाबदारी आणि दीर्घकाळापासून अडकलेल्या खलाशांना मुक्त करण्याच्या मानवी गरजेवर भर दिला.अराघची यांनी ओमानच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची 'सुरक्षित वाहतूक' सुनिश्चित करण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले.
'अल जझीरा'च्या वृत्तानुसार, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १६ एप्रिल रोजी युद्धविराम (Ceasefire) जाहीर होऊनही संघर्ष सुरुच आहे. युद्धविराम लागू झाल्यापासून आतापर्यंत मृतांची एकूण संख्या ३८ झाली आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता धोक्यात आली असून कराराचे उल्लंघन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.