Strait of Hormuz firing
नवी दिल्ली: होर्मुजच्या सामुद्रधुनीत शनिवारी भारतीय ध्वज असलेल्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून जहाजांचेही नुकसान झालेले नाही. तांत्रिक गोंधळामुळे हा गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'सैनमार हेराल्ड' नावाचे भारतीय जहाज या समुद्री क्षेत्रातून प्रवास करत असताना ही घटना घडली. जहाजावरील एका क्रू मेंबरने पाठवलेल्या 'डिस्ट्रेस मेसेज'मधून माहिती समोर आली आहे. "तुम्हीच आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली होती आणि आता आमच्यावरच गोळीबार करत आहात, आम्हाला मागे वळू द्या," असा संदेश या कर्मचाऱ्याने दिला होता.
व्हिडीओ फुटेजच्या विश्लेषणानुसार, जहाज 'ग्रीन एरिया'तून पुढे जात असताना अचानक त्याचे 'ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम' बंद झाले होते. काही वेळाने सिग्नल पुन्हा सुरू झाले तेव्हा जहाज पश्चिम दिशेला वळल्याचे दिसून आले.
या गोळीबारामागे इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'चा हात असल्याचा दावा एका टँकर कॅप्टनने केला आहे. दुसरीकडे, इराणच्या प्रसारमाध्यमांनी जहाजाने अचानक दिशा बदलल्यामुळे इशारा देण्यासाठी गोळीबार करण्यात आला, असे म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, ही जहाजे जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आली नव्हती, तर तांत्रिक गैरसमजातून हा प्रकार घडला असावा.
या घटनेनंतर भारताने तातडीने राजनैतिक पावले उचलली आहेत. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी इराणच्या राजदूतांची भेट घेऊन या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यापारी जहाजे आणि खलाशांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. इराणने यापूर्वी नेहमीच भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य केले आहे, याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.