पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ करामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी भारत आणि चीनने एकत्र उभे राहिले पाहिजे, असे भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी म्हटले आहे.
"चीन-भारत आर्थिक आणि व्यापार संबंध पूरकता आणि परस्पर फायद्यावर आधारित आहेत. अमेरिकेकडून शुल्काच्या गैरवापराचा सामना करताना दोन सर्वात मोठ्या विकसनशील देशांनी अडचणींवर मात करण्यासाठी एकत्र उभे राहिले पाहिजे," असे प्रवक्ते यू जिंग यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आणखी ५० टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. यानंतर चीननेही अमेरिकेविरोधातील व्यापार युद्धास सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी चीनवर टेरिफ लादल्यानंतर चीननेही अमेरिकन मालावर ३४ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. यानंतर ट्रम्प यांनी चीनवर आणखी ५० टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर चीननेही अमेरिकेच्या करामुळे आमच्यावर आकाश कोसळणार नसल्याचे स्पष्ट करीत व्यापार युद्धास तयार असल्याचे स्पष्ट केले.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, अमेरिकेचे तथाकथित 'परस्पर टॅरिफ' पूर्णपणे निराधार असून, ही एकतर्फी दबावाची आणि धमक्यांची नीती आहे. चीनने घेतलेली प्रतिकारात्मक पावले ही त्याच्या सार्वभौमत्व, सुरक्षेच्या आणि विकासाच्या हितासाठी आहेत. त्यामुळे त्या पूर्णपणे कायदेशीर व योग्य आहेत. अमेरिकेने जर या टॅरिफ धोरणावर ठाम राहिले, तर चीन शेवटपर्यंत लढेल. अमेरिका जी चूक आधीच करत आहे, त्यावर आणखी एक चूक करत आहे. चीन कधीही असा दबाव स्वीकारणार नाही, असे मंत्रालयाने ठणकावले.