वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय खत पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून यामुळे अन्नटंचाई आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेचे (डब्ल्यूटीओ) उपमहासंचालक जीन - मेरी पाोगाम यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, याचा परिणाम केवळ सध्याच नाही तर पुढील वर्षाच्या उत्पादनावरही होणार आहे.
जगातील सुमारे एक-तृतीयांश खतांची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होते; मात्र इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे ही सामुद्रधुनी जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे खत पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
आखाती प्रदेशात नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे, तो कृत्रिम खतांच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे; पण युद्धामुळे अनेक उत्पादन प्रकल्प बंद पडले आहेत, त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
भारत, थायलंड आणि ब्राझीलसारखे देश युरिया खतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. विशेषतः पश्चिम आणि उत्तर आफ्रिकेतील अन्न आयात करणार्या देशांना याचा मोठा फटका बसू शकतो. कोव्हिड काळात जशी साठेबाजी झाली होती, तसे पुन्हा झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल.
पोगाम यांच्या मते, सध्या खतांची कमतरता जाणवत नसली, तरी संघर्ष लांबल्यास पेरणीच्या हंगामात पुरवठा कमी होईल. त्यामुळे पुढील वर्षी पिकांचे उत्पादन घटेल आणि अन्नधान्याच्या किमती वाढतील.