वॉशिंग्टन – वृत्तसंस्था
भारतात येणाऱ्या परदेशस्थाचा भारताला लाभ झाला पाहिजे असे मत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी व्यक्त केले आहे. मॅनहॅटनमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. सीएए नंतर भारतातील परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सुधारित नागरिकत्व कायद्याला भारतात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. यानिमित्ताने घडणाऱ्या घटना दुःखद असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन कायद्याचा भारताला फायदा झाला पाहिजे. भारतीय समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे असे नाडेला यांनी सांगितले. एखादा परदेशी नागरिक भारतात आला तर त्याला नवीन उद्योग सुरू करता आला पाहिजे. तसेच एखाद्या बांग्लादेशी निर्वासिताला बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख होता आलं पाहिजे. तसा प्रमुख झालेला बांग्लादेशी नागरिक पाहणं आपल्याला आवडेल असे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर असा नागरिक इन्फोसिसचा पुढचा सीईओ म्हणून पहायला आवडेल, असेही नाडेला म्हणाले.
प्रत्येक देशाला आपले कायदे बनवण्याचा तसेच निर्वासितांसाठीचे धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. त्याचवेळी हे धोरण देश आणि समाजाच्या फायद्याचे असायला पाहिजेत. आपण अमेरिकेत आलो. तरीही भारतीय संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर आहे असे नाडेला यांनी आवर्जुन सांगितले. त्याचवेळी आपली प्रगती खुंटली नाही तर आपल्याबरोबर अमेरिकेच्या प्रगतीमध्येही हातभार लावता आला, तसेच भारतामध्ये येणाऱ्या परदेशस्थाचा भारताला फायदा झाला पाहिजे असा आशयाचे वक्तव्यही त्यांनी केले.
भारतात नुकताच सुधारित नागरिकत्व कायदा संमत करु घेतला. त्यानंतर अधिसूचना काढून हा कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे. या काद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ आधी भारतामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या बिगर मुस्लीम नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. या काद्याला विरोध करणाऱ्यांनी या काद्याच्या माध्यमातून धर्माच्या आधारे भेदभाव करुन भारताचे नागरिकत्व देणे भारतीय कायद्याला धरुन नसल्याचे म्हटलं आहे.