पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canadian Prime Minister Justin Trudeau) यांनी त्यांच्या देशात खस्लिस्तानी समर्थक (Khaslistani supporters) राहात असल्याची कबुली दिली आहे. पण ते संपूर्ण कॅनडातील शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असा खुलासाही त्यांनी केला आहे. खलिस्तानी समर्थक असल्याच्या ट्रुडो यांच्या कबुलीमुळे कॅनडा सरकार खलिस्तानी समर्थकांना आश्रय देत असल्याच्या भारताच्या भूमिकेला पुष्टी मिळाली आहे. (India-Canada tensions)
कॅनडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदू समर्थक आहेत. पण ते कॅनडातील संपूर्ण हिंदू समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असाही दावा त्यांनी केला आहे. "कॅनडात खलिस्तान्यांचे अनेक समर्थक आहेत, पण ते संपूर्ण शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. कॅनडात पीएम मोदी सरकारचे (Prime Minister Narendra Modi) समर्थकदेखील आहेत. पण ते संपूर्ण कॅनडातील हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाहीत," असे ट्रूडो यांनी सांगितले. त्यांनी कॅनडाची राजधानी ओटावा येथील पार्लमेंट हिल येथे दिवाळी साजरी करताना भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी कॅनडात खलिस्तानी समर्थक असल्याचे मान्य केले आहे.
कॅनडाने भारतविरोधी कट्टरतावाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप भारताने अनेकवेळा पुराव्यानिशी केला होता. पंजाबमधून आलेल्या अनेक संघटित गुन्हेगारांना मोकाट कारवाया करण्यास कॅनडाने परवानगी दिली आहे का? असा सवालही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याआधी केला होता. त्यावर आता कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोठा खुलासा केला आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणावरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधात तणाव वाढला आहे. या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी हे वक्तव्य केले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते.
१८ जून २०२३ रोजी ब्रिटीश कोलंबियामधील सुर्रे येथील गुरुद्वाराबाहेर दहशतवादी निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन भारतीयांना अटक झाली होती. यामागे भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता; पण भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. निज्जरने स्वतंत्र शीख राष्ट्राची मागणी केली होती. भारताने त्याला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते.