बिश्नोई गँगचे नाव घेत कॅनडाने भारताविरोधात गंभीर आरोप केले आहेत.  (File photo)
आंतरराष्ट्रीय

'बिश्नोई गँग'चं नाव घेत 'कॅनडा'नं भारताविरोधात पुन्हा गरळ ओकली

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि कॅनडा (India-Canada row) यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले गेलेत. कॅनडाने भारत सरकारवर नवीन गंभीर आरोप केलेत. भारताच्या एंजट्सचा कॅनडातील गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये थेट सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केलाय. पण या आरोपांची पुष्टी करण्यासाठी कॅनडाने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे भारताने हे बिनबुडाचे आरोप फेटाळून लावले आहेत. म्हणे कॅनडात असलेले भारतीय एजंट्स खलिस्तानी समर्थकांना टार्गेट करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत (Bishnoi gang) काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी (Baba Siddique murder news) यांची नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय आहे. याचदरम्यान, कॅनडाने केलेल्या आरोपात बिश्नोई गँगचा उल्लेख केला आहे. यामुळे बिश्नोई गँग चर्चेत आला आहे.

कॅनडातील हत्या प्रकरणात भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप

सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका निवेदनात, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (Royal Canadian Mounted Police) दावा केला आहे की कॅनडात मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या आणि इतर संबंधित प्रकरणांच्या तपासात कॅनडातील हत्या आणि हिंसक कारवायात भारतीय सरकारच्या एजंटांचा हात असल्याचे उघड झाले आहे.

India-Canada row : भारताने आरोप फेटाळले

भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि दुतावासातील इतर अधिकाऱ्यांचा निज्जर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. दरम्यान, कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि दुतावासातील इतर अधिकाऱ्यांवरील आरोप बिनबुडाचे असून ते आम्हाला मान्य नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

RCMP ने काय केला दावा?

"कॅनडा आणि परदेशातील विविध संस्थांचा वापर भारत सरकारच्या एजंट्सनी माहिती गोळा करण्यासाठी केला आहे. यापैकी काही व्यक्ती आणि व्यवसायिक आस्थापनांना भारत सरकारसाठी काम करण्यास भाग पाडण्यात आले. भारत सरकारसाठी गोळा केलेल्या या माहितीचा वापर नंतर दक्षिण आशियाई समुदायाच्या सदस्यांना टार्गेट करण्यासाठी केला गेला,” असे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारताने अनेकवेळा, कॅनडावर खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. जे कॅनडातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार होते. एअर इंडिया फ्लाइट १८२ बॉम्बस्फोटात ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT