नवी दिल्ली : बांगला देशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने हिंदूंसह शेजारी देशातील अन्य अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने एक विशेष समिती स्थापन केली आहे. बांगला देशात विशेषत: हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत, त्यासंदर्भात बांगला देशातील आपापल्या समकक्षांशी भारतीय बाजूकडून संवादाची प्रक्रियाही सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिली.
भारत-बांगला देश सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवरही ही समिती लक्ष ठेवेल. बांगला देशातील भारतीय नागरिक, हिंदूंसह बांगला देशातील इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेची हमी तेथील नव्या सरकारकडून मिळावी म्हणून बांगला देशातील समकक्ष अधिकार्यांशी संवाद साधेल. शहा यांनी या समितीबाबत सोशल मीडियावर एक पोस्टही टाकली आहे. ही समिती पूर्व कमांड सीमा सुरक्षा दल अतिरिक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील. बांगला देशातील भारतीय आणि हिंदू समुदायाच्या रक्षणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. हिंदूंची घरे, मंदिरे, व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड झाली आहे. अवामी लीगशी संबंधित हिंदू नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत.