क्वेट्टा; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या नैऋत्येकडील बलुचिस्तान प्रांतात गेल्या 40 तासांत पोलिस, लष्कर आणि बंडखोरांमध्ये जोरदार धुमशान उडाली. आत्मघाती बॉम्बस्फोट, गोळीबाराने पाकिस्तान हादरून गेले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बंडखोरांच्या गटाने 200 जवानांना ठार केल्याचा दावा केला असून पाकिस्तानी सैन्याने 144 बंडखोरांना कंठस्नान घातल्याचा दावा केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने थेट भारतावरच आरोप केले. मात्र ते ठामपणे फेटाळले.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुग्टी यांनी क्वेट्टामध्ये पत्रकार परिषद घेत सांगितले की, हल्ले झालेल्या सर्व जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आम्ही दहशतवाद्यांचा पाठलाग करत आहोत. आमचे रक्त स्वस्त नाही. त्यांच्या तळांपर्यंत पोहोचून त्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बुग्टी यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी ‘फितना-अल-हिंदुस्तान’ या नावाने ओळखल्या जाणार्या व भारत पुरस्कृत बंदी घातलेल्या बलूच लिबरेशन आर्मीच्या 144 सदस्यांना ठार केले. या मृत दहशतवाद्यांचे मृतदेह सध्या सरकारी ताब्यात असून त्यातील काही अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचा दावाही त्यांनी केला.
बलुचिस्तानातील सर्वाधिक सक्रिय असलेल्या या विभाजनवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. खनिजसंपन्न असलेल्या या प्रांतात पाकिस्तान परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना हे हल्ले झाले. सप्टेंबर 2025 मध्ये एका अमेरिकी धातू कंपनीने पाकिस्तानसोबत 500 दशलक्ष डॉलरचा करार केला होता. त्याआधीच अमेरिकेने आणि तिच्या सशस्त्र शाखेला परकीय दहशतवादी संघटना घोषित केले होते.
बंडखोरांच्या संघटनेच्या डावपेचात बदल
बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या भीषण आणि समन्वित हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन महिला आत्मघाती दहशतवाद्यांचे फोटो जाहीर केले आहेत. अलीकडील वर्षांतील हे सर्वात घातक हल्ले मानले जात असून, महिलांचा थेट सहभाग हा दहशतवादी डावपेचांतील गंभीर बदल मानला जात आहे. या दोन महिलांपैकी एकाची ओळख आसिफा मेंगल (वय 24) अशी करण्यात आली आहे. नुश्की जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आसिफाने कथितपणे आयएसआय तळावर आत्मघाती हल्ला केला. दुसरी महिला हल्लेखोर हवा बलोच असून तिचे वडील 2021 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले होते. दोघीही शिक्षित असल्याचे समोर आले आहे.