पुढारी ऑनलाईन डेस्क : Ind vs NZ Mumbai Test : मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस रोमांचकारी राहिला. पहिल्या डावात टीम इंडिया ३२५ धावांवर बाद झाली. पाहुण्या न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने डावातील सर्व १० बळी घेत इतिहास रचला. तर दुसरीकडे ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट घेत पाहुण्या संघाचा अवघ्या ६२ धावांत गाशा गुंडाळला. त्यामुळे भारताला २६३ धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने न्यूझीलंडला फॉलोऑन दिलेला नाही. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिल जखमी झाल्याने मयंक अग्रवाल सोबत चेतेश्वर पुजारा सलामीला आला. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात २१ षटकात बिनबाद ६९ धावा केल्या. भारताकडे आता एकूण ३३२ धावांची आघाडी झाली आहे.
किवी संघाच्या एकाही खेळाडूला विकेटवर उभे राहण्याचे धाडस दाखवता आले नाही. अश्विन ४, सिराज ३, अक्षर पटेल २, जयंत यादव १ ने विकेट घेतली. आर अश्विन पहिल्या डावात ४ विकेट्सच्या जोरावर ४२३ कसोटी बळींची नोंद केली. क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो आता १२ व्या क्रमांकावर आला आहे. अश्विनने आज दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकचा ४२१ विकेट्सचा विक्रम मागे टाकला.
१४ व्या षटकात आर अश्विनने पहिल्याच चेंडूवर हेन्री निकोल्स (७) याला बाद करून किवी संघाची ५ वी विकेट मिळवली. ५ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जयंत यादवनेही आपल्या पहिल्याच षटकात रचिन रवींद्रची (४) विकेट घेतली. टी-ब्रेकनंतर अश्विनने टॉम ब्लंडल (८) आणि टीम साऊथी (०) यांना बाद करत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. विल सोमरव्हिलची (०) विकेटही अश्विनने घेतली. किवी संघाचा ऑलआऊट करण्याचे काम अक्षर पटेलने केले. त्याने काईल जेमिसनला (१७) बाद करून त्यांच्या डावाचा शेवट केला.
न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात सर्वबाद ६२ धावांवर आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधली ही किवी संघाची सर्वात कमी धावसंख्या होती. यापूर्वी २००२ मध्ये न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध ९४ धावांत ऑलआऊट झाला होता. इतकेच नाही तर भारतीय भूमीवरील कसोटीतील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. १९८७ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत टीम इंडिया ७५ धावांत ऑलआऊट झाली होती.
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने विल यंगला (४) कॅप्टन कोहलीने झेलबाद केले. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने टॉम लॅथमची (१०) विकेट घेतली. सिराज इथेच थांबला नाही आणि त्याच्या पुढच्याच षटकात रॉस टेलरला (१) क्लीन बोल्ड केले. या तीन विकेट या युवा वेगवान गोलंदाजाने अवघ्या १३ चेंडूत घेतल्या. डॅरिल मिशेलला (८) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडची चौथी विकेट अक्षर पटेलने घेतली.
१४ व्या षटकात आर अश्विनने पहिल्याच चेंडूवर हेन्री निकोल्स (७) याला बाद करून किवी संघाची ५ वी विकेट मिळवली. ५ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जयंत यादवनेही आपल्या पहिल्याच षटकात रचिन रवींद्रची (४) विकेट घेतली. टी-ब्रेकनंतर अश्विनने टॉम ब्लंडल (८) आणि टीम साऊथी (०) यांना बाद करत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. विल सोमरव्हिलची (०) विकेटही अश्विनने घेतली. किवी संघाचा ऑलआऊट करण्याचे काम अक्षर पटेलने केले. त्याने काईल जेमिसनला (१७) बाद करून त्यांच्या डावाचा शेवट केला.
तत्पूर्वी, आज सकाळी साडेनऊ वाजता भारतीय संघाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे खेळण्यास सुरुवात केली. दुस-याच षटकात एजाजने भारताला सलग दोन झटने दिले. किवी संघाचा फिरकीपटू एजाजने ७२ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे रिद्धीमान साहा आणि आर अश्विनला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अक्षर पटेलने एजाजची हॅट्ट्रीक हुकवली. मयंक आणि साहा यांनी ५व्या विकेटसाठी १४४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली.
लंच ब्रेकनंतर पुन्हा एकदा एजाजच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. त्याने ९९.५ व्या षटकात शतकवीर मयंक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवले. टॉम ब्लंडेडने मयंकचा झेल पकडला. मयंकने ३११ चेंडूत १७ चौकार ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. त्यानंतर १०८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एजाजने अर्धशतकवीर अक्षर पटेलला पायचित केले. ही त्याची आठवी विकेट आहे. अक्षरने १२८ चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर १०९.२ व्या षटकात जयंत यादवची विकेट घेवून तो विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर पोहचला. अखेर १०९. ५ व्या षटकात ती वेळ आणि सर्व क्रिकेट जग स्तब्ध झाले. कारण एजाजने मोहम्मद सिराजला बाद करत एकाच डावातील १० वा बळी मिळवला. १९९९ नंतर त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचला.