पुढारी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर तसेच उपनगराला आज (दि. १८ जुलै) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढच्या ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा (Mumbai rains) देण्यात आला आहे.
IMD ने रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Heavy rainfall alert) जारी करण्यात आला आहे.
येत्या पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा येथे मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच १९ जुलैपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारच्या बुलेटीनमध्ये सांगितले आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड आणि मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.
या आठवड्यात नैऋत्य मान्सूनचा आणखी एक सक्रिय टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने पूरग्रस्त हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.
वायव्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आसल्याने मंगळवारी दुसरे चक्रीवादळ तयार होईल. यामुळे चांगला पाऊस अपेक्षित आहे. यामुळे मध्य आणि द्वीपकल्पीय प्रदेशात पावसाची कमतरता भरून काढू शकेल असेही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातही पाऊस पडतच राहील, असेही IMD ने म्हटले आहे.