मुंबई: पुढारी वृत्तसेवा : कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. २८) सकाळी विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल. कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयांचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा रे सरकार खोके सरकार… शेतकऱ्यांचा कांदा सरकारने केला वांदा… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा