बीड; पुढारी वृत्तसेवा : अन्न भेसळ सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यास दररोज शंभर रुपये दंड आकारला जात होता. याबाबतच्या नियमात सुधारणा करावी अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून आता परवाना नुतनीकरणासाठी मोबाईलवर संदेश पाठवला जाणार आहे. याची अंमलबजावणीही आता सुरु झाली आहे.
अन्न परवान्याचे नुतनीकरण वेळेत न झाल्यास प्रतिदिन 100 रुपयांप्रमाणे विलंब शुल्क आकारले जाते. या शुल्काबाबत फेरविचार करुन नियमात बदल करावा अशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत पवार यांना कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी नवी दिल्ली येथे दिले होते. तसेच व्यापाऱ्यांना नुतनीकरण करण्याच्या एक महिना अगोदर मेसेजद्वारे अग्रीम सुचना दिली जाईल, यामुळे व्यापार्यांना नाहक भुर्दंड लागणार नाही असे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्याची देशभरात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून आता परवाना नुतनीकरणासाठीचे मेसेज व्यापार्यांना येऊ लागले आहेत.
आता प्रत्येक व्यापार्याने आपल्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज तपासणे गरजेचे आहे. ज्यांना अन्न परवाना नुतनीकरण करणे गरजेचे आहे त्यांना नुतनीकरणाचा संदेश येणार आहे. हा परवाना वेळेत नोंदणी केल्यास दंड द्यावा लागणार नाही. या प्रश्नावर पाठपुराव्यासाठी आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी सहकार्य केले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तातडीने प्रश्न सोडवल्याबद्दल व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे आणि व्यापारी बांधवांनी आभार मानले आहेत.