Latest

कायद्याच्या चौकटीतच सरकारला काम करावे लागते : अजित पवार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुणी काय मागणी करावी, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सरकारला मात्र नियमात आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. त्यामुळे न्यायालयात टिकेल असे मराठा आरक्षण सरकारला द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीवर दिली आहे. अजित पवार यांनी शनिवारी सकाळी भिडेवाडा व फुलेवाडा येथे भेट देऊन पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार चर्चा करत आहे. यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही.

आता तिसर्‍या वेळी न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे यांना मागण्या करण्याचा अधिकार आहे. कोणी काय मागणी करावी, हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. सरकारला मात्र, नियमानुसार कायद्याच्या चौकटीत बसणार्‍या गोष्टी कराव्या लागतात. गृहमंत्री अमित शहा हे संसदेच्या कामकाजामुळे भेटत नाहीत. त्यांनी भेटायला बोलावले तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे रद्द करून भेटण्यासाठी जाऊ, असेही पवार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. खा. सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर ते म्हणाले, नियमांचा भंग केल्यानंतर खासदार किंवा आमदारांना निलंबित केले जाते. संसदेत ही कारवाई एकट्या सुळेंवर झाली नाही. तिथे काय घडले, मला माहीत नाही. विधानसभेत काय घडले ते मी सांगितले असते. बारामतीमध्ये योग्य उमेदवार दिला जाईल, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष बदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. हे सर्वच क्षेत्रांत आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून इतिहास पाहिला, तर वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित आलेले पाहायला मिळतील. त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून विविध पातळीवर निर्णय घेतले जातात. अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आहे असेही त्यांनी पक्षाच्या बैठकीवर विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. कुठेही अडचण येणार नाही, काही अडचण येईल असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

श्रीराम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाही
पवार म्हणाले, मला अजून निमंत्रण आलेले नाही. आले तर जायचा विचार करेन. मी सर्वधर्म समभाव मानणारा आहे. प्रत्येकाची श्रद्धा असते आणि तिला दुखवायचे नाही.

शौर्यदिनी आवश्यक सुविधा पुरवा
पेरणे येथे होणार्‍या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार्‍या अनुयायांसाठी सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने राहुल डंबाळे यांनी दिली. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने राहुल डंबाळे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व अन्य प्रशासकीय विभागांकडून देण्यात येणार्‍या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT