डिचोली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलांना राज्य, देश व जागतिक स्तरावर वेगवेगळ्या रोजगार संधींचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने अनिवासी भारतीय कमिशनबरोबर करार केलेला आहे. विशेष करून वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांबरोबरच इतर अनेक क्षेत्रातील उपलब्ध संधी गोमंतकीय युवकांना मिळाव्यात व स्किल इंडिया या नव्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
पद्मिनी फाऊंडेशन व स्किल इंडियाच्या माध्यमातून रवींद्र भवन येथे राज्य, देश व जागतिक पातळीवर उपलब्ध संधी, विविध व्यावसायिक उपलब्धी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदवीधर व उच्च शिक्षित ग्रामीण व शहरी भागातील सुमारे अडीचशे मुले उपस्थित होती.
या वेळी व्यासपीठावर मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, संतोष मळीक, विठोबा घाडी, शिखर सक्सेना,आनी बर्न, सिद्धार्थ सावकार, रामू वेणूगोपाळी, व्हॅलेन्टाईन इथंडी, पूजा मयेकर, श्रीकांत गोसावी, हर्षा सक्सेना, भारती शर्मा आदी उपस्थित होते.
शेकडो उच्चशिक्षित विद्यार्थी विविध पदव्या घेऊन बसले आहेत. आपल्याला सरकारी नोकरीच हवी, हा हट्ट उपयोगाचा नाही. आज कौशल भारत मंत्रालयाच्या माध्यमातून शेकडो क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. ग्रामीण मुलांना त्याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी हा पहिला प्रयत्न आहे. सर्व भागात असे मार्गदर्शन उपक्रम हाती घेतले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी देश पातळीवर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहा प्रमुख वक्त्यांनी रोजगार व्यावसायिक संधी उपलब्धतता याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. संतोष मळीक यांनी कार्यक्रम आयोजनाची माहिती दिली. सूत्रसंचालन पूजा मायनीकर, लक्ष्मण गावस, सर्वेश नाईक यांनी केले.
'उठा, जागे व्हा व संधीचे सोने करा,' : मुख्यमंत्री
आज गोव्यात अनेक संधी आहेत. मात्र गोव्याचे सुशिक्षित घरी बसून आहेत. तर परराज्यातील युवक अनेक व्यावसायिक क्षेत्रात रोजगार संधी घेत आहेत. हे चित्र बदलावे व गोव्याच्या ग्रामीण मुलांना ती संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. 'उठा, जागे व्हा व संधीचे सोने करा,' असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. या वेळी पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी युवकांचा पद्मिनी फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.