दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
दोडामार्ग तालुक्यात पुन्हा हत्तींनी उपद्रव माजवला आहे. तालुक्यातील घोडगे येथील शेतकरी संतोष दळवी यांच्या फळबागेत गेल्या पाच दिवसांपासून या हत्तींचा कळप धुडगूस घालत आहे. या हत्तींनी बागेतील नारळ, सुपारी, अन्य फळझाडे आणि बांबूंची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली असून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. हत्तींच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तब्बल २३ वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव कायम आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात शासन आणि वन विभाग अपयशी ठरल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
हत्तींच्या सततच्या वावरामुळे बागायती व शेती उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे; मात्र तुटपुंजी नुकसानभरपाई मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून सहा हत्तींचा कळप घोटगे, मोर्ले, घोटगेवाडी परिसरात फिरत आहे. येथील शेतकरी संतोष दळवी यांच्या फळबागेत हत्तींचा कळप घुसला व त्यांनी अनेक फळझाडे उद्ध्वस्त केली.
या नुकसानीची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील, वनपाल गते यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी हत्तींच्या वाढत्या उपद्रवाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
"गेल्या पाच दिवसांपासून हत्तींचा कळप बागेत ठाण मांडून असून त्यांनी सर्व झाडे उद्ध्वस्त केली आहेत. गेल्या वर्षीही हत्तींनी आपल्या बागेत धुडगूस घातल्याने सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले होते; मात्र वन विभागाच्या निकषात अनेक झाडे बसत नसल्याने मला योग्य भरपाई मिळाली नाही. आता पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे."— संतोष दळवी, शेतकरी, घोडगे, ता. दोडामार्ग